साधारणपणे घराचा अथवा जागेचा व्यवहार करतांना सात बाराचा उतारा आवश्यक असतो. या संदर्भात सद्या व्हॉट्स ॲप वर एक पोस्ट फिरत आहे त्यात सात बारा ला अहिल्याबाई होळकर यांची आख्यायिका जोडली ती अशी. 'त्यांनी सरकारी खर्चाने गरीब माणसाच्या दारात १२ फळझाडे लावली. त्यातील सात झाडे त्या गरीबाची व पाच सरकारची. बारा झाडांची निगा राखून सात झाडांची फळे स्वतः घ्यायची आणि राहिलेल्या पाच झाडांची फळे सरकारला जमा करावयाची त्यामुळे याला 7/12 असे म्हणू लागले. गरिबांना फळे मिळण्यासाठी एक सरकारी दफ्तर निर्माण करून या झाडांची नोंद करण्यात आली. या नोंदीला सात बाराचा उतारा असे म्हणण्याचा प्रघात पडला. जो आजतागायत सुरु आहे. या संदर्भात दुसरा दाखला असा कि एका कायद्याच्या कलम 7 आणि 12 मध्ये जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात उल्लेख आहे. त्यामुळे या जमीन मालकीच्या कागदाला सातबारा असं म्हणतात. वास्तविक वरील दोन्ही बाबी म्हणजे दंतकथा आहे. सातबारा उताऱ्यात गाव नमुना ७ आणि गाव नमुना १२ एकाच पत्रकात असल्यामुळे त्याला सातबारा उतारा म्हटल्या जाते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या खंड ४ नुसार तलाठी दफ्तरात गाव नमुना १ ते गाव नमुना २१ हे नमुने तयार झाले. त्यामध्ये सात आणि बारा क्रमांकचा नमुना हा जमिनीशी संबधित असल्यामुळे तो एकत्रित केल्यामुळे त्याला सात बारा म्हटल्या जाते. बाकी त्याच्या नावाशी निगडीत कलम ७ आणि कलम १२ असा काही संबंध नाही. १९१० साली बंदोबस्त योजनाअंतर्गत जमिनीचे अभिलेखे तयार करण्यात आले. यामध्ये प्रत्येक जमिनीची मोजणी करून त्याला एक क्रमांक दिला, ज्याला सर्व्हे नंबर म्हटल्या जाते. याच जमिनीच्या मालकी संदर्भात कढई पत्रक तयार करण्यात आले. १९३० साली इंग्रजांनी जमिनीला कर (महसूल) लावण्याला सुरुवात केली. ह्यातून शेती मालकी संदर्भात मालकी हक्काची नवीन पुस्तिका १९३० साली जन्माला आली. स्वातंत्र्यापूर्वी कढई पत्रकात असलेला हा सात बारा आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन स्वरुपात मिळत आहे.
0 Comments